अदानी समूह : विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह कायम   

भाग्यश्री पटवर्धन

अदानी समूहाबाबत याच स्तंभात आपण चर्चा केल्याचे आठवत असेल. त्यावेळी या समूहाच्या शेअरचा विचार करू नये असे सुचवले होते, तीच स्थिती आजही कायम आहे. हा समूह सिमेंट, बंदरे, वीज निर्मिती, प्रसार माध्यम, कृषी अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहे.
 
भांडवली बाजारावर नोंदणी झालेल्या कंपन्यांच्या भवितव्याचा आणि जागतिक राजकारणातील मैत्री किंवा वैर भावाचा काही संबंध आहे का? या प्रश्नाचे उत्तर महत्त्वाकांक्षी उद्योजक गौतम अदानी यांच्या समूहातील कंपन्यांच्या शेअरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या वाढीत दडलेले आहे. खरे तर अशी काही मैत्री किंवा वैर याच्याशी गुंतवणूकदारांना काही देणेघेणे नसते. 
 
धारावी झोपडपट्टी पुनवर्सन प्रकल्पापासून तुमच्या घरात येऊ घातलेल्या वीज मीटरपर्यंत कोट्यवधी लोकांशी अदानी समूह जोडलेला आहे. हा समूह चर्चेत आला, त्याचे कारण त्याच्याविरोधात अमेरिकेत सुरु असलेली नियमभंग कारवाई आणि ती टाळावी यासाठी थेट अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सरकारकडे सुरु असलेले समूहाचे प्रयत्न. नियम भंग झाला का हे चौकशीत स्पष्ट होईल, मग तोवर वाट पाहण्याआधी कारवाई करू नका, अशी विनंती करण्यात आली.सौर वीज निर्मितीची कंत्राटे मिळावीत यासाठी अदानी कंपनीने भारतातील अधिकार्‍यांना लाच दिल्याच्या प्रकारांबाबत अमेरिकेतील न्यायालयात प्रकरण सुरु आहे. या लाचखोरीच्या आरोपात तथ्य नसल्याचे अमेरिकेतील काही स्वतंत्र यंत्रणांनी केलेल्या तपासात आढळून आले होते. 
 
अदानी एनर्जी कंपनीने त्याबाबत स्पष्टीकरण दिले आणि काही प्रमाणात समूहाच्या शेअरमध्ये वाढ दिसली; मात्र ती अल्पकालीन ठरली. याआधी याच स्तंभात आपण अदानी समूहाबाबत चर्चा केल्याचे आठवत असेल. त्यावेळी या समूहाच्या शेअरचा विचार करू नये, असे सुचवले होते, तीच स्थिती आजही कायम आहे. हा समूह सिमेंट, बंदरे, वीज निर्मिती, प्रसार माध्यम, कृषी असा विविध क्षेत्रांत कंपनी कार्यरत असली, तरी तिचे प्रवर्तक आणि पूर्वेतिहास याकडे पाहिल्यास वाद अधिक झाल्याचे दिसतात. 
 
काही उद्योग समूहांच्या कार्यपद्धतीत त्रुटी आहेत, की काय अशी शंका अदानी समूहाबाबत सातत्याने निर्माण होत असलेल्या वादाच्या प्रसंगामुळे येते. कारणे काहीही असोत याचा फटका संबंधित कंपनीचे ग्राहक, वित्त पुरवठादार, ग्राहक आणि गुंतवणूकदार यांना सहन करावा लागतो. त्याही पेक्षा केंद्राच्या कंपनी व्यवहार खात्यापासून भांडवल बाजार नियामक सेबीपर्यंत असा सर्वच यंत्रणांच्या कामकाज पद्धतीबाबत मग शंका उपस्थित होते. या यंत्रणा नेमक्या कोणाच्या हितासाठी काम करत आहेत? असा प्रश्न उपस्थित होतो. सेबीच्या भूतपूर्व प्रमुख माधवी पुरी-बूच यांचे या समूहाशी काही हितसंबंध आहेत का? हे प्रकरण याआधीही न्याययंत्रणेपर्यंत पोहचल्याचे आठवत असेल. 
 
एकीकडे ही पार्श्वभूमी असताना केरळ सरकारने मात्र, विझिनजम बंदर निर्माणासाठी याच समूहाला कंत्राट दिले आणि ते काम सुरु झाले. या समूहाने मागील वर्षी काही सिमेंट कंपन्याही विकत घेऊन मोठे व्यवहार केले. हे सारे नमूद करण्याचे कारण इतकेच की, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील ज्या बँका या उद्योगाला पतपुरवठा करतात त्यांचे हे भांडवल कालांतराने धोक्यात येणार अशी शक्यता नाही का? इथे प्रश्न केवळ त्या उद्योगाच्या प्रतिमेचा नसून, नियामकांच्या विश्वासार्हतेचा आहे. सध्या तरी सर्व सामान्य गुंतवणूकदारांनी या समूहाच्या कंपन्यांच्या शेअरकडे साफ दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल.

ससा, कासव आणि पराग पारीख फंड

एखाद्या म्युच्युअल फंडाने भांडवली बाजारात पदार्पण करून एक तप म्हणजे १२ वर्षे पूर्ण केली यात विशेष काही नाही; मात्र संबंधित फंडाच्या व्यवस्थापकांकडून जी उद्दिष्टे ठरवली जातात ती पूर्ण झाल्यावर त्याची जाहिरातबाजी केली जात नाही. गुंतवणूकदार आकृष्ट व्हावे म्हणून लागोपाठ योजना जाहीर केल्या जात नाहीत. हा फंड म्हणजे पराग पारीख फंड. त्याचे संस्थापक आता हयात नाहीत. ते स्वतः नामांकित बर्कशायर हाथवेचे कर्मचारी. या फंडाची नाममुद्रा पाहिली तर एक वेगळेपण लक्षात येते. आपण सगळ्यांनी ससा आणि कासवाची गोष्ट अनेकदा ऐकली आहे. या गोष्टीत कासव जिंकते. नाममुद्रेत कासव आहे. पराग पारीख फंड हा त्या कासवासारखाच आहे. वेग कमी असला, तरी सातत्य, विश्वासार्हता, प्रसारमाध्यमांच्या गलबल्यापासून दूर, निवडक फंड (एकूण सहा), परताव्यात सातत्य ही त्याची अंगभूत वैशिष्ट्ये. आज इक्विटीमध्ये त्यांच्याकडे असलेली एकूण मालमत्ता सर्वाधिक म्हणजे ८० हजार कोटी रुपये आहे! परदेशातील जागतिक दर्जाच्या फेसबुक, गुगल, अ‍ॅमेझॉन या कंपन्यांमध्येही गुंतवणूक कमाल झालेली आहे. राजीव ठक्कर हे फंड व्यवस्थापक आहेत. सुरुवातीपासून या फंडाने इंडेक्सपेक्षा किमान तीन ते चार टक्के अधिक परतावा दिला आहे.

Related Articles